राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याशी सहमत नसल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुंबई शहराच्या जडणघडणीत मराठी माणसाने दिलेले योगदान कधीही दुर्लक्षित करता येणार नाही, असे ते म्हणाले.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजस्थानी समाजाच्या एका कार्यक्रमात भाषणादरम्यान “कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही.”
राज्यपाल हे घटनात्मक पद भूषवत असून त्यांनी आपल्या वक्तव्याने कोणाचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. कोश्यारी यांनी शुक्रवारी संध्याकाळी येथे एका कार्यक्रमादरम्यान सांगितले होते की, जर गुजराती आणि राजस्थानी लोक मुंबईत राहत नसतील तर इथे पैसा उरणार नाही आणि ती देशाची आर्थिक राजधानी होणार नाही.
या टीकेवरून झालेल्या वादानंतर राज्यपालांनी शनिवारी सांगितले की, त्यांच्या वक्तव्याचा गैरसमज झाला आहे. ते म्हणाले की, “मराठी भाषिक लोकांच्या मेहनतीला खीळ घालण्याचा त्यांचा कोणताही हेतू नाही”.
राज्यपालांनी केलेल्या विधानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “राज्यपालांचं विधान वैयक्तिक आहे. त्यांच्याशी आम्ही सहमत नाही. मुंबईच्या विकासात मराठी माणसाचं योगदान कुणीही नाकारू शकत नाही. १०६ हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. यात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं योगदान सर्वांना माहिती आहे. मराठी माणसामुळे मुंबईला नावलौकिक प्राप्त झाला आहे.” असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
ते म्हणाले, “मुंबईच्या विकासात आणि प्रगतीत मराठी समाजाच्या मेहनतीचा वाटा आहे. हे अफाट क्षमता असलेले महत्त्वाचे शहर आहे. देशभरातील लोकांनी ते आपले घर बनवूनही मराठी माणसाने आपली ओळख आणि अभिमान कायम ठेवला आहे आणि त्याचा अपमान होता कामा नये.