Sunday, April 28, 2024
Homeराज्यकाँग्रेसने युती केली तर वाचतील नाही तर… अमरावतीच्या सभेतून प्रकाश आंबेडकरांचा महाविकास...

काँग्रेसने युती केली तर वाचतील नाही तर… अमरावतीच्या सभेतून प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीला सल्ल..!

Share

अमरावती : काँग्रेसने युती केली तर वाचतील आणि युती नाही केली तर, जेल मध्ये जातील. काँग्रेस – राष्ट्रवादी – उध्दव ठाकरे यांची शिवसेना यांनी बसून समझोता करावा. समझोता नाही झाला तर, तुम्ही जेल मध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. असा ईशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी अमरावती येथील लोकशाही गौरव महासभेतून महाविकास आघाडीला दिला आहे.

दोन वर्ष ओलांडली तरीही, काँग्रेस – राष्ट्रवादी – शिवसेना यांच्यात समझोता झाला नाही. अजूनही लोकसभेच्या 48 जागा यांना वाटता आल्या नाहीत. मला राहून राहून शंका येते की, यांना खरचं मोदी आणि भाजपला हरवायचं आहे का ?असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

आम्ही कुरबानीचा बकरा नाही. तुम्ही तुमच्या जागा वाटून घ्या. आम्हाला ज्या जागा पाहिजेत त्या आम्ही ज्यांच्याकडे गेल्यात त्यांच्यासोबत वाटाघाटी करू घेऊ आणि नाही जमलं तर 48 च्या 48 जागा आम्ही लढवायला तयार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

वंचित बहुजन आघडीपैकी जेल मध्ये एकही जाणार नाही मात्र, जेल मध्ये सोनिया गांधींपासून इतर सगळे जातील. मोदी वाघ म्हटल तरी खात आहे आणि वाघोबा म्हटल तरी खात आहे. मग, दोन हात करायला कशासाठी भीत आहात? असा प्रश्न त्यांनी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला विचारला आहे.

भाजपला हरवयाची काँग्रेसची ईच्छा आहे का ? असा सवाल करत त्यांनी सांगितले की, चार जागा कमी मिळाल्या किंवा चार जागा जास्त मिळाल्या तर फरक काय आहे?तुमच्या मानगुटीवर कारवाईची तलवार आहे. एकत्र लढलात तर ती तलवार उडवू शकता. पण, भीत भीत लढलात तर ती तलवार तुमच्या मानगुटीवर पडल्याशिवाय राहणार नाही.
तुम्ही आम्हाला जर चर्चेत घेतलं तर, आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुम्ही जसं इथल्या गरीब मराठ्याला वापरत आलात त्याच पद्धतीने जर वंचितला वापरायचा विचार केला तर, मोदी सोबत आम्ही तुम्हालाही गाडू एवढं लक्षात ठेवा. असा ईशारा त्यांनी काँग्रेस आणि इतर प्रस्तापित पक्षांना दिला आहे.

भारत जोडो यात्रा कधी सुरू झाली आणि कधी संपणार आहे ? ती या महिन्यात संपणार आहे की, मार्च मध्ये संपणार आहे ? असे म्हणत या भारत जोडो यात्रेला नरेंद्र मोदी पावनखिंडीत अडवल्याशिवाय राहणार नाही.

राम मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमावर लक्ष वेधत त्यांनी म्हटले की, 22 तारखेच्या निमित्ताने देशात धार्मिक माहोल उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. तो किती यशस्वी अयशस्वी होईल हे येणारा काळच ठरवेल.

निवडणुका तोंडावर आले असताना त्याला तोंड देण्याच्या ऐवजी काँग्रेसवाले भारत जोडो न्याय यात्रा काढत आहेत त्या भारत यात्रेमधून आरएसएस बीजेपीवाले हरणार असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत,असे त्यांनी नमूद केले.

कंत्राटी कामगारांना त्यांनी सवाल केला की,खाजगीकरणाचे धोरण असणाऱ्यांच्या पक्षाच्या बाजूने जाणार की, इथं कल्याणकारी, सार्वत्रिकता मागणी करणाऱ्या पक्षांच्या बाजूने जाणार ? वंचित बहुजन आघाडी हाच एक मार्ग तुम्हाला पर्मंनंट करू शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले.

फुले – शाहू – आंबेडकर ही चळवळ मान सन्मानाची – फुले, शाहू, आंबेडकर ही चळवळच मान सन्मानाची चळवळ असल्याचे त्यांनी या सभेत सांगितले. भाजप आणि आरएसएस मान सन्मानाची गोष्ट करत नाहीत. आम्ही फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून आम्ही गुलामी संपवली आहे आणि मानवता टिकवली आहे असेही त्यांनी नमूद केले.

सभेला प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर, युवक प्रदेश अध्यक्ष नीलेश विश्वकर्मा, प्रदेश उपाध्यक्ष डॉ धैर्यवर्धन पुंडकर, युवा प्रदेश महासाचिव राजेंद्र पातोडे, महिला प्रदेश महासचिव अरुंधती सिरसाठ, माजी राज्य मंत्री डॉ रमेश गजभे, महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉ निशाताई शेंडे, प्रदेश महिला उपाध्यक्ष डॉ गजाला खान, जिल्हाध्यक्ष शैलेश गवई, जिल्हाध्यक्ष अशोक मोहोड, युवा जिल्हाध्यक्ष अंकूश वाकपांजर, युवा जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुख प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: