निंबाळकरांकडील ती ऑडिओ क्लिप बनावट – दीपक माने…गैरव्यवहार बाहेर येण्याच्या भीतीने आरोप, सरगर व टोळीची चौकशीची मागणी…

0
125
deepak mane
Share

सांगली – ज्योती मोरे.

काँग्रेस नगरसेविका वर्षा निंबाळकर यांचे पती अमर निंबाळकर यांना कोणतीही धमकी दिलेली नाही. त्यांच्याकडील ऑडिओ क्लिप बनावट आहे. विकासकामातील भ्रष्टचार बाहेर येतोय हे कळल्यावर रचलेले कुभांड आहे, असे खुलासा भाजपचे संघटन सरचिटणीस दीपक माने यांनी केला. दरम्यान संजयनगर मध्ये नगरसेवक मनोज सरगर आणि त्यांच्या टोळीची दहशत आहेच. तरुणांना नशेची सवय लावण्याचे उद्योग सुरू आहेत, याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली असून लवकरच सरगर यांचा बुरखा फाडू, असा इशाराही माने यांनी दिला आहे.

अमर निंबाळकर यांना धमकी देण्याचे कारणच नाही. काही विकासकांमध्ये मोठा गैरव्यवहार झाला आहे. त्याच्या चौकशीसाठी आपला पाठपुरावा सुरु आहे. गैरकारभार चव्हाट्यावर येईन अशी भीती निंबाळकर यांना आहे. त्यातूनच त्यांनी बनावट ऑडिओ क्लिप तयार करून खोटे आरोप करण्यास सुरुवात केली आहे. त्यात सत्यता नाही. माझी आणि भाजपची बदनामी करणे हाच उद्देश आहे. पण खोट्या आरोपांना घाबरणार नाही. निंबाळकर यांचा गैरकारभार चव्हाट्यावर आणूच असा इशारा देत माने म्हणाले, निंबाळकर यांनी रचलेले कुभांड त्यांच्याच अंगलठी येणार आहे.

संजयनगर परिसरात कोणाची दहशत आहे. तरुणांना कोण वाम मार्गाला लावतोय हे जनतेला माहीत आहे. सरगर यांनी साळसूदपणाचा आव आणू नये असे. त्यांचे सर्व कारनामे बाहेर काढणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये भाजप उमेदवाराचा पराभव झाला. पराभव मान्य करून आम्ही शांतच बसलो होतो. पण सरगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजप समर्थकांच्या दारात जात जल्लोष केला. नारळ फोडले, शस्त्रे नाचावली. ही वस्तुस्थिती आहे. याबाबत तब्बल आठ जणांनी संजयनगर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे.

पैकी दोन फिर्यादीवरून सरगर व त्यांचा टोळीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उर्वरित सहा तक्रारीवर पोलीस चौकशी करत आहेत. यातून सत्य बाहेर येईलच. पण संजयनगर परिसरातील दहशत मोडून काढण्यासाठी प्रयत्न केले जातील. गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे. सरगर व त्यांच्या टोळीच्या चौकशीची मागणी केली आहे असे सांगत माने म्हणाले, संजयनगर पोलिसांच्या भूमिकेवरही संशय आहे. नुकत्याच झालेल्या खून प्रकरणातील आरोपीबाबत शाशंकता आहे. त्याचीही सखोल चौकशी व्हावी यासाठी गृहमंत्री फडणवीस यांना साकडे घातले आहे. चौकशी मध्ये “दूध का दूध, पाणी का पाणी होईल.”

संजयनगर मध्ये कोट्यवधींची विकासकामे, संजयनगरमध्ये पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, खासदार संजय पाटील यांच्या निधीमधून कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. तब्बल ८० लाख रुपये खर्च करून अद्ययावत अभ्यासिका उभी केली जात आहे. परिसरातील मुले एमपीएससी कडे वळावीत. आयएएस, आयपीएस, डॉक्टर, इंजिनीयर व्हावीत यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही माने यांनी सांगितले.


Share