Homeराज्यविदर्भातील वृत्तपत्राची सुरुवात अमरावतीहून झाली - भालचंद्र रेवने...

विदर्भातील वृत्तपत्राची सुरुवात अमरावतीहून झाली – भालचंद्र रेवने…

Share

तक्षशिला महाविद्यालयात ‘विदर्भातील वृत्तपत्रे व संपादक’ या विषयावर व्याख्यान

प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी साधला संवाद

अमरावती – विदर्भातून अमरावतीला पहिले वृत्तपत्र काढण्याचा मान मिळाला आहे. श्रीगणेश नारायण कोल्हटकर यांनी १८६७ साली वर्हाड समाचार हे साप्ताहिक सुरु केले. त्यांचा छापखाना हा अमरावतीलाच होता. हे साप्ताहिक बरेच दिवस चालल्यानंतर कालांतराने अकोला येथून त्याचे प्रकाशन होऊ लागले.

विदर्भातील वृत्तपत्राची सुरुवात अमरावतीहून झाली असून अकोल्याहून नंतर ते सातारा येथे स्थायिक झाले असल्याचे प्रतिपादन विदर्भ मतदारचे जेष्ठ स्तंभलेखक भालचंद्र रेवने यांनी केले. ते तक्षशिला महाविद्यालयातील पत्रकारिता व जनसंवाद विभागातर्फे आयोजित  ‘विदर्भातील वृत्तपत्रे व संपादक’ या विषयावर बोलत होते.  त्यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.       

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाअंतर्गत तक्षशिला महाविद्यालयात बी.ए. (जर्नालिजम अँड मास कम्युनिकेशन) हा पदवी अभ्यासक्रमाअंतर्गत  पाचव्या सत्रात मराठी जर्नालिजम हा विषय आहे. त्यामध्ये ‘विदर्भातील वृत्तपत्रे व संपादक’ याविषयी संपूर्ण एक युनिट आहे. त्याच अनुषंगाने विदर्भ मतदारचे जेष्ठ स्तंभलेखक भालचंद्र रेवने यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव प्रा. पी.आर.एस. राव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंजनकुमार सहाय उपस्थित होते.

व्याख्यानाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संस्थेचे आधारस्तंभ स्मृतिशेष रा.सु. गवई याना अभिवादन करून झाली. त्यानंतर जेष्ठ नाट्यकर्मी राजाभाऊ मोरे याना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली दिली. यावेळी विभागप्रमुख प्रा. विलास फरकाडे, प्रा. अमित त्रिवेदी, प्रा. राजरत्न मोटघरे यांची उपस्थिती होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंजनकुमार सहाय यांनी अशा ऐतिहासिक व्याख्यानाची गरज असून याचा विद्यार्थ्यांना नक्की फायदा होणार असल्याचे सांगितले.

पुढे बोलतांना भालचंद्र रेवने म्हणाले, वर्हाड समाचार नंतर अमरावतीला रामभाऊ केसरकर यांनी प्रमोदसिंधू हे साप्ताहिक काढले. हे सुधारक विचारसरणीचे होते. यामध्ये दादासाहेब खापर्डे यांनी १८९४ साली विधवेला पुनर्विवाहाची परवानगी असावी असा लेख प्रसिद्ध केला. यानंतर अमरावतीला कर्तव्य हे साप्ताहिक प्रसिद्ध नट श्री. भांगले यांनी काढले. स्वातंत्र्यानंतर हे वृत्तपत्र वैद्य बंधूनी सांभाळले. अमरावती शहरात १९५० हिंदुस्थान वृत्तपत्र बाळासाहेब मराठे यांनी सुरु केले ते आजही सुरु आहे.  

जनमाध्यम, विदर्भ मतदार, मातृभूमी वृत्तपत्रे निघू लागली. शिक्षणाच्या वाढत्या प्रसाराबरोबर विदर्भातही वृत्तपत्रांची संख्या वाढू लागली. १९०२ च्या सुमारास टीकाकार नावाचे एक साप्ताहिक निघाले होते. त्याचे वैशिष्टय व्यंगचित्रे देणे हेच होते, तर देशसेवक (नागपूर-१९०७) या वृत्तपत्राने एक तेजस्वी परंपरा सुरू केली. त्याचे संपादक अच्युतराव कोल्हटकर हे होते. पुढे गोपाळराव ओगले झाले परंतु पुढे ओगल्यांनी १४ जानेवारी १९१४ मध्ये महाराष्ट्रनामक (नागपूर) नवीन साप्ताहिक सुरू केले.

त्याला विदर्भात त्याकाळी केसरीची प्रतिष्ठा लाभली होती. त्यानंतर द्विसाप्ताहिकात (१९२९) व पुढे दैनिकात त्याचे रूपांतर करण्यात आले (१९४७). त्यावेळी त्याचे संपादक पुरुषोत्तम दिवाकर ढवळे होते. पुढे महाराष्ट्र १९७५ पासून तेथील कामगारांनी सहकारी तत्त्वावर चालविण्यास घेतले असले तरी ते बंद पडले आहे. याखेरीज वर्धा येथून सुमती. अमरावती येथून ना.रा. बामणगावकर संपादित उदय हे साप्ताहिक सुरु झाले.

कालांतराने ते अर्धसाप्ताहिक झाले असून अमरावतीच्या इतिहासात १९२० पासून नियमित निघणारे हे अर्धासाप्ताहिक होते.  वीर वामनराव जोशी संपादित स्वतंत्र हिंदुस्थान (१९२३) आणि नागपूरहून ना.भा.खरे यांचा तरुण भारत अशी अनेक वृत्तपत्रे निघू लागली. त्यांतील उदय दीर्घायुषी ठरले, तर तरुण भारताचे पुनरुज्जीवन ग.त्र्यं. माडखोलकरांनी १९४४ साली केले. पुढे ते नरकेसरी प्रकाशन संस्थेला विकले. त्यांच्यानंतर मा. गो.वैद्य व सध्या  दि. मा. घुमरे हे त्याचे संपादक आहेत. तरुण भारत हे विदर्भातील एक अग्रगण्य वृत्तपत्र मानले जाते. जनजागरणाचे काम तर त्याने केलेच, पण लोका भिरुची विकसित करण्याची जबाबदारीही पार पाडली.  

नागपूरप्रमाणेच यवतमाळचे लोकनायक बापूजी अणे संपादित लोकमत साप्ताहिक (४ एप्रिल १९१९-जून १९३०-३२) आणि अकोल्याचे मातृभूमि (१९३१) तसेच शिवशक्ती (१९६०) या वृत्तपत्रांनीही लोकमत तयार करण्याची बाजू चांगली सांभाळली. लोकमत पुढे जवाहरलाल दर्डा यांनी नागपूरला आणले व १५ डिसेंबर १९७१ मध्ये त्याचे दैनिकात रूपांतर केले. सध्या ते आघाडीवर असून त्याच्या जळगाव व औरंगाबाद येथूनही आवृत्त्या निघतात.

याखेरीज चांडक यांचे महासागर (नागपूर-१९७१) आणि अनंतराव शेवडे यांची नागपूर पत्रिका (नागपूर -१९७०) या वृत्तपत्रांनीही वैदर्भीय वृत्तपत्रसृष्टीला फुलविण्याचे काम सुरू ठेवले आहे. शिक्षणाच्या वाढत्या प्रसाराबरोबर विदर्भातही वृत्तपत्रांची संख्या वाढू लागली. १९०२ च्या सुमारास टीकाकार नावाचे एक साप्ताहिक निघाले होते. त्याचे वैशिष्टय व्यंगचित्रे देणे हेच होते, तर देशसेवक (नागपूर-१९०७) या वृत्तपत्राने एक तेजस्वी परंपरा सुरू केली. त्याचे संपादक अच्युतराव कोल्हटकर हे होते.       

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम इंगळे तर उपस्थितांचे आभार श्रीकांत सरगर या विद्यार्थ्याने मानले. यावेळी पत्रकारिता व जनसंवाद विभागातील श्रीकांत सरगर, तपन लोथे,  प्रथम इंगळे, अमिता बेठेकर, अजय भगत, संघर्ष लौकरे, शुभम रौराळे, निखिल गवई,  

पियुष धुळे, विजयपाल तायडे, आचल विलास ढोणे, अविनाश आमटे, मयुर बहादुरे, संकेत भुसारी, प्रज्वल बेलसरे, आकाश भारसाकळे, लखन सुरतने, आदिनाथ बुरकुले, गौरव घट्टे, संतोष यादव, गौरव मोटघरे, वैभव अवतिक,  साहिल तायडे, आर्यमेघ सरदार, अभिजित नांदणे हे  विद्यार्थी उपस्थित होते.

वृत्तपत्राचे महत्व अबाधित राहणार-प्रा. पी.आर.एस. राव

श्रीकांत सरगर या विद्यार्थ्याने सोशल व इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे प्रिंट मीडियावर परिणाम झाला आहे का? हा प्रश्न विचारला असता यावर संस्थेचे सचिव प्रा. पी.आर.एस. राव यांनी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली एक चित्रफीत दाखविली. चित्रफीतमध्ये प्रिंट मीडियाला समाज, प्रशासन, देशाला एकत्रित जोडणारा दुवा म्हटले आहे.

आजही घटनेची सत्यता जाणून घेण्यासाठी लोक वृत्तपत्र वाचतात. देशात वेगवेगळ्या २२ भाषांमधून ४० करोड वृत्तपत्रे निघतात. स्वातंत्र्य लढ्यात वृत्तपत्राचे योगदान मोठे असून स्वातंत्र्यानंतर अनेक भ्रष्ट सरकार सत्तेतून बरखास्त केली आहे त्यामुळे वृत्तपत्रांचे महत्व कमी होणार नाहीत.  

वार्तांकन करताना संयम महत्वाचे- भालचंद्र रेवणे

प्रथम इंगळे या विद्यार्थ्याने वार्तांकन करतांना पत्रकाराने काय काळजी घ्यावी? असा प्रश्न विचारला असता यावर भालचंद्र रेवणे यांनी उत्तर देताना म्हटले की, पत्रकारांमध्ये वस्तुनिष्ठता, सत्यता असावी परंतु संयम पाळनेही महत्वाचे असल्याचे सांगितले. घटनेचे महत्व बघून बातमी लिहावी, कारण पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे, बातमीतून अफवा पसरू नये याची काळजी वार्तांकन करताना घ्यावी.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: