Monday, May 6, 2024
Homeराज्यउन्हाळ्यात ग्राहकांच्या वाढीव मागणी साठी महावितरण कडून १३४० दशलक्ष युनिट अतिरिक्त वीजखरेदी...

उन्हाळ्यात ग्राहकांच्या वाढीव मागणी साठी महावितरण कडून १३४० दशलक्ष युनिट अतिरिक्त वीजखरेदी…

Share

अमरावती/मुंबई – उन्हाळ्याच्या कालावधीत राज्यातील ग्राहकांची विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणने मार्च, एप्रिल व मे महिन्यात लघुकालीन करार व पॉवर एक्सचेंजमधून एकूण १३४० दशलक्ष युनिट अतिरिक्त वीजखरेदी करून मागणीनुसार पुरवठा करण्यात यश मिळविले आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.

उन्हाळ्यातील वाढत्या मागणीचा अंदाज घेऊन महावितरणने ग्राहकांना जादा वीज पुरवठ्याचे नियोजन करण्याची सूचना मा. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार महावितरणने अधिकची वीज खरेदी केली. परिणामी मागणीनुसार वीज पुरवठा करता आला आणि कुठेही भारनियमन होऊ दिले नाही.

उन्हाळ्यामुळे महावितरणच्या विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. मार्च व एप्रिल महिन्यात विजेची कमाल मागणी अनुक्रमे २४,९८३ मेगावॅट व २४,३२६ मेगावॅट इतकी नोंदली गेली आहे. मे महिन्यातील कमाल मागणी २४,०४७ मेगावॅट होती.

मार्च महिन्यात ३०० मेगावॅट, एप्रिलमध्ये ४०० मेगावॅट आणि मे महिन्यात ४०० मेगावॅट विजेच्या खरेदीसाठी लघुकालीन करार करण्यात आले होते. या माध्यमातून या तीन महिन्यात महावितरणने ६५६ दशलक्ष युनिट अतिरिक्त वीजखरेदी केली.

उन्हाळ्यातील वाढती वीज मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणने पॉवर एक्सचेंजच्या सुविधेचाही लाभ घेतला आहे. विजेची उपलब्धता आणि दर ध्यानात घेऊन नियमितपणे पॉवर एक्सचेंजवरून वीज खरेदी केली जाते. महावितरणने पॉवर एक्सचेंजवरून मार्च महिन्यात १३९ दशलक्ष युनिट तर एप्रिल महिन्यात ३२९ दशलक्ष युनिट वीज खरेदी केली. मे महिन्यातील वीज खरेदी २१६ दशलक्ष युनिट इतकी होती.

महावितरणने पंजाब व इतर काही राज्यांसोबत केलेल्या पॉवर बँकिंग कराराच्या आधारे मार्चमध्ये ५०० मेगावॅट, एप्रिलमध्ये ४५० मेगावॅट आणि मे महिन्यात २५० मेगावॅट वीज उपलब्ध केली. पॉवर बँकिंग करारात महावितरणकडे अतिरिक्त असलेली वीज अन्य राज्यांना दिली जाते व त्या बदल्यात महावितरणला गरज असेल त्यावेळी त्यांच्याकडून वीज घेतली जाते. विजेची गरज पूर्ण करण्यासाठी कोयना जलविद्युत प्रकल्पातून गरजेनुसार १९०० मेगावॅटपर्यंत वीजनिर्मिती करून पुरवठा करण्यात येत आहे.

पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी राज्यात महावितरणकडून मोठ्या प्रमाणात पावसाळापूर्व देखभाल दुरुस्तीची कामे सुरू आहेत. त्यासाठी स्थानिक पातळीवर गरजेनुसार काही वेळ वीज पुरवठा खंडित करावा लागतो. वादळासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे कधी कधी वीज पुरवठा खंडित होतो.

वीज पुरवठा करणाऱ्या पारेषण कंपनीच्या उच्च क्षमतेच्या वाहिन्यांमध्ये बिघाड झाला तर महावितरणकडे वीज उपलब्ध असूनही ग्राहकांना पुरवठा करता येत नाही. तथापि, राज्यात मागणीनुसार उपलब्ध वीज नाही अशी समस्या महावितरणला जाणवलेली नाही.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: