Homeराज्यशबरी घरकुल योजनेंतर्गत ५४८० लाभार्थ्यांना निधी मंजूर : डी. मल्लिकार्जुन रेड्डी...

शबरी घरकुल योजनेंतर्गत ५४८० लाभार्थ्यांना निधी मंजूर : डी. मल्लिकार्जुन रेड्डी…

Share

रामटेक व पारशिवनी विधानसभा मतदारसंघातील लाभार्थ्यांना मिळणार लाभ

रामटेक – राजु कापसे

रामटेक विधानसभा मतदारसंघातील पारशिवनी आणि रामटेक तालुक्यात आदिवासी मूळ लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने एकूण ५४८० घरे मंजूर केली असल्याची माहिती माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी काल दि. ८ ऑगस्ट ला शहरातील दिप हॉटेल येथे पार पडलेल्या पत्रपरीषदेत दिली.

यासाठी रेड्डी यांनी मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित आणि भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार व्यक्त केले. माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांनी पत्रपरिषदेत दिलेल्या माहीतीनुसार पारशिवनी तहसीलमध्ये सन २०२२-२३ मध्ये ५८३ , २०२३-२४ मध्ये ७६९, एकूण १३५२ आणि रामटेक तालुक्यात २०२२-२३ मध्ये १५०० आणि २०२३-२४ मध्ये २६२८ एकुण ४१२८ अशा लाभार्थ्यांचा समावेश आहे.

अशा लाभार्थ्यांपैकी आदिवासींना शबरी घरकुल योजनेंतर्गत ५४८० एवढ्या मोठ्या प्रमाणात घरकुले मंजूर केल्याबद्दल रामटेक विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित आणि भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले.

त्याचप्रमाणे अतिदुर्गम भागात राहणाऱ्या अनेक आदिवासींना घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांना लवकरच शासनाकडुन घरे मिळतील असे आश्वासन माजी आमदार डि.मल्लिकार्जुन रेड्डी यांनी दिले आहे. रामटेक विधानसभा क्षेत्रातील अनेक समस्यांबाबत माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांनी खंत व्यक्त करीत सांगीतलं की, विधानसभेच्या अखत्यारीतील अनेक गावांमध्ये शाळकरी मुले व ग्रामस्थांना एसटी बस सेवा समान प्रमाणात मिळत नाही.

पारशिवनी व रामटेक परिसरातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर सिंचन व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. शेतकर्‍यांना त्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळावा, यासाठी देवलापार येथे कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू झाली पाहिजे. परिसरात उच्च शिक्षणाची सेवा सुरू करावी. देवलापार संकुलात ७२ गावांचा समावेश असून आदिवासीबहुल भाग देवलापारला तहसीलचा दर्जा द्यावा. परिसरातील शासकीय आरोग्य विभागातही उच्च दर्जाची सेवा उपलब्ध असायला हवी.

हर घर जल नल योजना २०२२ ही केंद्र शासनाची जिल्हा परिषद विभाग जल जीवन अभियानामार्फत सुरू करण्यात आली. तरीही अनेक घरांमध्ये पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही, याची व्यवस्था करावी. यूपीएससी एमपीएससी स्पर्धात्मक पूर्व प्रशिक्षण शिक्षण केंद्र स्थापन करावे, जेणेकरून परिसरातील शिक्षण घेणाऱ्या तरुण-तरुणींना त्याचा योग्य लाभ घेता येईल.

तसेच पारशिवनी (कुंवारा भिवसेन परिसर) येथील चार गावांमध्ये आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय मंजूर केल्याबद्दल राज्य सरकारचे आभार व्यक्त केले. तसेच शासनाने घरकुल बांधकाम लवकर सुरू करावे अशी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. यावेळी उपस्थीतांमध्ये माजी आमदार श्री. मल्लिकार्जून रेड्डी,ग्रामविकास आघाडी जिल्हाध्यक्ष श्री.राजेश ठाकरे,

तालुकाध्यक्ष तसेच उपसभापती श्री.नरेंद्र बंधाटे,महामंत्री नंदकिशोर कोहळे,आदिवासी आघाडी तालुकाध्यक्ष रामानंद अडामे, आनंदराव चोपकर,आलोक मानकर,करीम मालाधारी,गोपी कोल्हेपरा, धंनजय तरारे,अनिता टेटवार,मनोज मानकर,उज्ज्वला धमगाये आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: