Saturday, May 4, 2024
Homeराज्यसंविधान संपवण्याची भाषा करणाऱ्या भाजपला हद्दपार करा - खा. इमरान प्रतापगडी...

संविधान संपवण्याची भाषा करणाऱ्या भाजपला हद्दपार करा – खा. इमरान प्रतापगडी…

Share

दक्षिणेत भाजप साफ तर उत्तरेत भाजप हाफ चा कित्ता महाराष्ट्र गिरवणार…

अकोला – या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून देशावर मोठे संकट निर्माण झाले आहे.एकीकडे जातीयवादी भाजप संविधान बदलण्याची भाषा बोलत आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी,मलिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वात काँग्रेस संविधान वाचवण्यासाठी देशभर निरनिराळे आंदोलन चालवीत आहे. ही निवडणूक नसून ही मूल्यांची लढाई आहे.

या लढाईत सर्व संविधान व राष्ट्र प्रेमी नागरिक मतदारांनी सहभागी होऊन भाजपला पराभूत करण्याचे आवाहन खा. इमरान प्रतापगडी यांनी केले.गडंकी रोड परिसरातील मैदानात अकोला लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अभय पाटील यांच्या प्रचारार्थ खा इमरान प्रतापगडी यांची जंगी जाहीर सभा संपन्न झाली.

या सभेत प्रतापगडी यांनी भाजपवर जोरदार हल्ले चढवत जुमले देणाऱ्या भाजपचे वाभाडे काढले. ते म्हणाले,ही शांत बसण्याची वेळ नाही आहे. देशावर फार मोठे संकट आहे हे.संकट युवकांनी ओळखून ताज्या दमाच्या डॉ अभय पाटील यांना निवडून आणण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले आजकाल भाजपच्या सभेत जेवढी गर्दी होत आहे, तेवढी गर्दी एकट्या काँग्रेसच्या मंचावर होत आहे.

जनता आता भाजपचे पोकळ आश्वासन समजायला लागली आहे. केवळ खासदार निवडण्यासाठी ही निवडणूक नाही आहे.एकीकडे संविधान बदलण्यासाठी बहुमत मागणारा भाजप तर दुसरीकडे संविधान वाचवण्यासाठी मेहनत घेणारे राहुल गांधी आहेत! अशा वैचारिक मूल्यांची व विचारधारेची ही लढाई आहे.

संसदेपासून तर सडके पर्यंत ही लढाई अंतिम टोकापर्यंत लढायची आहे. यासाठी काँग्रेस सारख्या सर्वधर्म समभावाचा विचार करणाऱ्या पक्षावर निष्ठा ठेवून महिला, शेतकरी, युवक, अल्पसंख्यांक, आदिवासी,दलित आदी वर्गाने काँग्रेसला सत्तेत पोहोचवण्याचे आवाहन खा प्रतापगडी यांनी यावेळी केले.

निवडणुकीत नरेंद्र मोदी हे खोट्यांचे पीक निर्माण करत आहे. मात्र आता मतदार हा सुजाण झालेला आहे उलट काँग्रेसने आपल्या घोषणा पत्रात अनेक तरतुदी निर्माण केल्या असून यामध्ये सर्व जाती जमातीच्या महिलांसाठी एक लाख रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. एकीकडे काँग्रेस आकर्षक व सर्व समावेशक घोषणापत्र देत असून दुसरीकडे भाजप तरुणांना भजे तळण्याचे सांगत आहे. तरुणांची दिशाभूल करीत आहे.

म्हणून निवडणुकीत 20 कोटी खोट्या नोकऱ्या देण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपला तरुण वर्ग या निवडणुकीत मातीत गाडुन टाकेल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. राहुल गांधी म्हणतात की, चारशे पार म्हणणारी भाजप दीडशेच्या आत जागा घेणार.आहे हे खरे असून भाजपची गर्दी व भाजपची जादू आता ओसरायला लागली असून अराजक वाजवणारा भाजपला युवाशक्ती ही वठणीवर आणणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ज्या संविधानाचे डॉ बाबासाहेब आंबेडकर, नेहरू, गांधी, मौलाना आझाद यांनी जीवापाड रक्षण केले ते संविधान नष्ट करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. दुसरीकडे महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आदिवर बोलत नाही. अशा सर्व बाबी मतदारांनी बघून भाजपला पराभूत करण्याचे आवाहन इमरान प्रताप गडी यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. नफरत के बाजार मे मोहब्बत की दुकान खोलने काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

महानगर काँग्रेसचे नेते तथा मनपाचे विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण यांनी साकार केलेल्या व महानगर काँग्रेसचे अध्यक्ष डॉ प्रशांत वानखडे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या जाहीर सभेत मंचावर अकोला लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ अभय पाटील, माजी राज्यमंत्री अजहर हुसेन, माजी राज्यमंत्री अनिस अहमद, माजी आ नतिकुद्दीन खतीब,माजी आ बबनराव चौधरी, प्रदेश काँग्रेसचे वजाहत मिर्झा, हिदायत पटेल, सय्यद युसुफ अली, रवी राठी, अनिस भाई,

अब्दुल जब्बार,डॉ जिशान हुसेन, माजी उपमहापौर रफिक सिद्दिकी,निखिलेश दिवेकर, जमीर पैलवान, अफरोज खान लोधी, नवाब साहेब, शकील भाई, मकसूद भाई, जिनल गाला, देवश्री ठाकरे, विभा राऊत, अनुजा शहा,मोईन खान मोंटू, पुष्पाताई देशमुख,इंनू पैलवान, आपचे जिल्हाध्यक्ष कैलास प्रांजळे, गुड्डू पठाण कपिल रावदेव,शोहेब रंगरेज,

जमीलभाई, शौकत अली,मो इरफान आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अफरोज खान लोधी, बबनराव चौधरी,अजहर हुसेन,आदींनी आपले विचार व्यक्त करीत केवल डॉ अभय पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले. मान्यवराचे स्वागत साजिद खान पठाण, मोहम्मद फजलु, डॉ फैयाज,कमरुद्दिन भाई नफीज भाई अब्दुल जमीर, कशिश खान, मोहीम खान हैदर भाई आदींनी केले,तर माजी नगरसेवक रवी शिंदे, पराग कांबळे,आकाश कवडे, राहुल सारवण,

अंकुश पाटील आदींनी छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा तर रैनू साहेब, महेंद्र गवई, यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा, मोहम्मद जवाद, सुफियान अहमद, शेख कलीम ,आरिफ अली, नफिस अहमद ,मेहमूद खान पठाण, शोएब अख्तर, सै सज्जू, मुजाहिद ,सोयल खान आदींनी हजरत टिपू सुलतान यांची प्रतिमा भेट दिली.

अभिलाष प्रकाश तायडे यांनी स्वागत केले. सर्वप्रथम खा इम्रान प्रतापगडी यांचे आगमन होताच त्यांना फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करीत सलामी देण्यात आली. उपस्थित युवकांनी राहुल गांधी जिंदाबाद, डॉ अभय पाटील आगे बढोच्या घोषणा दिल्यात. इम्रान प्रतापगडी यांचे विचार ऐकण्यासाठी खैर मोहम्मद प्लॉट,अकोट फाईल,जुने शहर, भगतवाडी,

आरपीटीएस रोड,खदान,गवली पुरा,नायगाव परिसरातील नागरिक मतदारांनी मोठी गर्दी केली होती.संचालन मो इरफान यांनी तर आभार मोईन खान मोंटू यांनी मानलेत. यावेळी मोठ्या संख्येने युवाशक्ती या मैदानात उपस्थित झाली होती.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: