Homeराज्यअकोल्यात लोकसभेसाठी भाजपचे 'धक्कातंत्र'. भाजप ऐनवेळी नवा उमेदवार देण्याची शक्यता...

अकोल्यात लोकसभेसाठी भाजपचे ‘धक्कातंत्र’. भाजप ऐनवेळी नवा उमेदवार देण्याची शक्यता…

Share

प्रकाश आंबेडकरांची उमेदवारी जाहीर झालेली असतांना भाजपात अद्यापही सामसूम.

भाजप ‘धोत्रे-पाटील’ गटांपलिकडचा उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा.

अकोला – सध्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीची लगबग सुरू झालेली असतांना अकोल्यात मात्र राजकीय क्षितीजावर सर्व शांतता आहे. एकीकडे वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी आधीच अकोल्यातून आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे.

नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच जिल्हाभर वंचितनं ‘नया साल, नया खासदार’ म्हणत प्रचाराला सुरूवात केली आहे. मात्र, भाजपच्या खेम्यात मात्र प्रचंड शांतता आहे. याचं कारण आहे भाजपचे सध्याचे खासदार संजय धोत्रे यांचं आजारपण. त्यांच्या आजारपणामूळे भाजपला नवा उमेदवार शोधावा लागणार आहे.

2004, 2009, 2014 आणि 2019 असे सलग चारवेळा संजय धोत्रे अकोल्यातून विजयी झालेत. खासदार संजय धोत्रें 2019 मध्ये मोदींच्या दुसऱ्या मंत्रीमंडळात शिक्षण, माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण खात्याचे राज्यमंत्री होते. मात्र, जून 2021 मध्ये आजारपणामूळे मंत्रीमंडळाचा राजीनामा दिला़. राजीनाम्यानंतर ते दुर्धर आजाराने अंथरुणाला खिळलेले आहेत. त्यामूळे भाजपासमोर त्यांच्यासारखा सर्वमान्य उमेदवार देण्याचं आव्हान आहे.

जिल्ह्यात भाजपमध्ये खासदार संजय धोत्रे आणि माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील असे दोन गट आहेत. मात्र, डॉ. रणजीत पाटलांच्या विधानपरिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघात पराभवानंतर त्यांचा गट शक्तीहीन झाला आहे. तर जिल्ह्यातील पक्षसंघटनेवर संजय धोत्रे गटाची घट्ट पकड आहे. धोत्रे गटाचं प्रत्येक गावात असणारं कार्यकर्त्यांचं असणारं जाळं ही त्यांची जमेची बाजू आहेय. तर डॉ.रणजीत पाटील हे याबाबतीत मागं पडत असल्यानं धोत्रे गटाचं पारडं उमेदवारीसाठी जड समजलं जातं.

सध्या भाजपच्या उमेदवारीसाठी संभाव्य दावेदारांमध्ये सध्या भाजपचे अकोला लोकसभा प्रमुख असलेले संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे, माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय मालोकार आणि माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांचा समावेश आहे.

अनुप धोत्रे : संभाव्य उमेदवारांमध्ये सर्वाधिक चर्चेतलं नाव म्हणजे अनुप धोत्रे यांचं. अनुप हे संजय धोत्रे यांचा थोरला मुलगा आहेत. गेल्या २५ वर्षांपासून संजय धोत्रे यांचं अकोला जिल्ह्याच्या राजकारणावर एकछत्री अंमल आहे. पाच वर्ष मुर्तिजापूरचे आमदार आणि २० वर्ष खासदार म्हणून त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात स्वत:चा दबदबा निर्माण केला. सर्वसामान्य माणूस आणि कार्यकर्त्यांशी धोत्रे यांचा थेट संपर्क.

यासोबतच संजय धोत्रे २४ तास जनता आणि कार्यकर्त्यांना उपलब्ध असलेला जमिनीवरचा नेता अशी त्यांची प्रतिमा जिल्ह्यात आहे. हाच वारसा घेऊन त्यांचा मुलगा अनुप यांनी राजकारणात पदार्पण केलं आहे. धोत्रे यांच्या आजारपणानंतर अनुप धोत्रे राजकारणात चांगलेच सक्रीय झालेत. दोन वर्षांपासून ते पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रम आणि आंदोलनात सक्रीय आहेत. वर्षभरापुर्वी त्यांची पक्षाने अकोला लोकसभा प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.

संजय धोत्रे यांच्यासारखाच सहज उपलब्ध असणे आणि लोकांमध्ये मिसळणे हा गुण अनुप यांच्यात आहे. गेल्या दोन वर्षांत त्यांनी कार्यकर्त्यांशीसुद्धा चांगले संबंध स्थापित केले आहेत. मात्र, प्रकाश आंबेडकरांसारख्या मुरब्बी नेत्यासमोर अनुप हे अतिशय नवखे ठरतात.

त्याचबरोबर घराणेशाहीच्या विरोधात रणशिंग फुंकू पाहणारा भाजप अकोल्यात धोत्रेंची घराणेशाही स्वीकारणार का?. याबरोबरच संजय धोत्रेंनी जिल्ह्याचा खासदार म्हणून कोणतंच मोठं काम आणि प्रकल्प मतदारसंघात न आणल्यानं त्याबद्दल मतदारांमध्येही मोठी नाराजी आहे. या सर्व समीकरणांचा विचार करूनच भाजप अनुप धोत्रेंना उमेदवारी देण्याचा विचार करण्याची शक्यता आहे.

डॉ. रणजीत पाटील : धोत्रे गटाव्यतिरिक्त अकोल्यात उमेदवारीवर मोठा दावा आहे तो डॉ. रणजीत पाटील यांचा. डॉ. रणजीत पाटील हे फडणवीसांच्या सरकारमध्ये गृह विभागासह डझनभर खात्यांचे राज्यमंत्री होते. त्यांना फडणवीस मुख्यमंत्री असतांना ‘शॅडो सीएम’ म्हटलं जायचं. फडणवीसांचे विश्वासू, अभ्यासू व्यक्तीमत्व आणि ओघवती वक्तृत्वशैली यामूळे ते पक्षवर्तुळात चांगलेच लोकप्रिय होते.

जिल्ह्यात भाजपमध्ये खासदार संजय धोत्रे आणि माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील असे दोन गट आहेत. या दोन गटातील वाद पक्षासाठी अनेकदा डोकेदुखी ठरली आहे. त्यातच डॉ. रणजीत पाटलांचा विधानपरिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघात पराभव झाल्यानंतर त्यांचा गट भूमिगत झाला आहे.

त्यातच डॉ. रणजीत पाटील हे जनता आणि कार्यकर्त्यांमध्ये न मिसळणारे नेते अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यातच जिल्ह्याच्या पक्षसंघटनेत त्यांचं नेतृत्व मानणारा वर्ग जवळपास नसल्यानं त्यांनी निवडणुक लढणे सोपे नाही. सोबतच त्यांच्या उमोदवारीला जिल्ह्यातील धोत्रे गट ताकदीने विरोध करण्याची शक्यता आहे. त्यामूळे डॉ. रणजीत पाटील यांना उमेदवारी देतांना पक्षासमोर मोठी आव्हानं आहेत.

नारायणराव गव्हाणकर : बाळापुरचे दोनदा आमदार राहिलेले माजी आमदार नारायणराव गव्हाणकर हे पक्षाचे आणखी एक प्रमुख दावेदार आहेत. ते जिल्ह्यात प्राबल्य असलेल्या कुणबी समाजाचे नेते आहेत. याआधी अकोल्यात कुणबी समाजाचे नेते असलेले पांडूरंग फुंडकर यांनी सलग तीनदा लोकसभेत अकोल्याचं नेतृत्व केले. त्यामूळेच भाजपला मराठा व्यतिरिक्त कुणबी कार्ड खेळायचं असल्यास गव्हाणकर सक्षम पर्याय होऊ शकतात.परंतू, गव्हाणकरांना उमेदवारी देतांना अनेक आव्हानंही त्यांच्यापुढे आहेत.

सर्वातआधी ते सध्या डॉ. रणजीत पाटील यांच्या गटात असल्याने धोत्रे गट त्यांच्या नावाला विरोध करू शकतो. त्यासोबतच त्यांनी लोकसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी २०१४ मध्ये भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर सध्या त्यांनी आपल्या मुलाला वंचितकडून जिल्हा परिषदेवर निवडून आणल्यानं त्यांचे पक्षांतर्गत विरोधक याचं भांडवल करीत त्यांच्या उमोदवारीला विरोध करण्याची शक्यता आहे.

विजय मालोकार : भाजपकडून चौथं सर्वात चर्चेत असलेलं नाव आहे ते पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय मालोकार यांचं. विजय मालोकार हे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आणि युतीच्या काळात एसटी महामंडळाचे संचालक राहिले आहेत. फक्त २०१४ चा अपवाद वगळता त्यांनी अकोला पूर्व मतदारसंघातून अपक्ष म्हणून ३० ते ४० हजारांवर मतं घेतलीत. २००४ मध्ये त्यांनी या मतदारसंघात अपक्ष म्हणून तब्बल ४० हजारांवर मतं घेतली होती.

या निवडणुकीत त्यांचा अगदी थोडक्यात पराभव झाला होता. भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांची पक्षाने प्रदेश कार्यकारिणीवर वर्णी लावली. भाजपच्या वर्तुळात त्यांची ओळख आमदार रणधीर सावरकरांचे कट्टर समर्थक अशी आहे. जिल्ह्यात मराठा समाजात तिरळे आणि घाटोळे कुणबी असा वाद आहे. जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा असलेल्या संजय धोत्रे यांच्या तिरळे कुणबी समाजाचं मालोकार प्रतिनिधित्व करतात.

त्यातच त्यांचे धोत्रे परिवाराशी नातेसंबंध असल्याने त्यांना धोत्रेंचा पर्याय म्हणून पक्ष पसंती देऊ शकतो. यासोबतच मालोकार यांचे मराठा समाजातील सर्वच जातींसह ओबीसी, आदिवासी दलित आणि लहान जातींमध्येही जवळचे संबंध आहेत. त्यामूळे हा पर्याय भाजपसाठी सक्षम ठरू शकतो असं राजकीय जाणकारांचं मत आहे.

पक्षाने ऐनवेळी डॉ. रणजीत पाटलांचं नाव समोर केलं तर धोत्रे गटाकडून त्यांना पर्याय म्हणून विजय मालोकार यांच्या नावाला पसंती मिळू शकण्याची चर्चा आहे. त्यामुळे धक्कातंत्र वापरण्यासाठी प्रसिद्ध असलेली मोदी-शहांची जोडी अकोल्यात विजय मालोकार यांच्यारुपानं पक्षातील प्रस्थापित फळीला धक्का देऊ शकतात.

2019 चा अकोला लोकसभेचा निकाल
प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते :

संजय धोत्रे : भाजप : 5,54,444
प्रकाश आंबेडकर : वंचित बहूजन आघाडी : 2,78,848
हिदायत पटेल : काँग्रेस : 2,54,370

भाजप उमेदवार संजय धोत्रे 2 लाख 75 हजार 596 मतांनी विजयी

अकोल्यात सध्या प्रकाश आंबेडकर हे लोकसभेचे एक उमेदवार असतील हे स्पष्ट झालं आहे. ते फक्त वंचितचे उमेदवार असतील की महाविकास आघाडी-वंचित युतीचे याचं उत्तर काही दिवसात मिळेलच. मात्र, भाजपचा उमेदवार हा सर्व राजकीय पंडितांचे अंदाज चुकवणारा असेल अशी शक्यता वर्तविली जात आहे. घोडामैदान जवळच असल्याने पुढच्या महिनाभरात या ‘सस्पेंस’चे उत्तर मिळणार आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: