Sunday, May 5, 2024
HomeराजकीयAmravati Loksabha | अंडरवर्ल्ड पासून बड्या बिल्डरांचा पैसा अमरावतीमध्ये खेळवला जात आहे...यशोमती...

Amravati Loksabha | अंडरवर्ल्ड पासून बड्या बिल्डरांचा पैसा अमरावतीमध्ये खेळवला जात आहे…यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप…वाचा

Share

Amravati Loksabha : सर्व राज्याच लक्ष लागून असलेल्या अमरावती लोकसभा मतदार संघात दररोज राजकीय घडामोडी बघायला मिळतात. तर आता पुन्हा एकदा नवनीत राणा आणि रवी राणा यांना माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी उद्देशून X वर पोस्ट केली आहे आणि त्यामधून रवी राणा यांना टार्गेट करीत गंभीर आरोप त्यांनी केले आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांची स्थिती सध्या तरी मजबूत असली तरी वेळेवर काय बदल होणार हे आतातरी सांगता येणार नाही. त्यापूर्वी यशोमती ठाकूर यांनी x वर लिहलेली पोस्ट मुले नवीन वादाला तोंड फुटणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पोस्ट जशीच्या तशीच खाली टाकीत आहोत.

“महाराष्ट्राला नवा आर.आर. आबा सापडला…अमरावतीमध्ये धनशक्ती विरूद्ध जनशक्ती असा मुकाबला सुरू आहे. अंडरवर्ल्ड पासून बड्या बिल्डरांचा पैसा अमरावतीमध्ये खेळवला जात आहे. या धनशक्तीच्या जोरावर पोलीस-प्रशासन नाचवलं जातंय. कोट्यवधी रूपये उधळून प्रचार यंत्रणा राबवली गेली. आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन करून लहान मुलांचा, धार्मिक प्रतिकांचा वापर केला गेला. जात-धर्मामध्ये तेढ निर्माण करणारा प्रचार करून ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र या ही परिस्थितीत केवळ संविधानाच्या रक्षणाकरिता, अमरावतीच्या समृद्ध राजकीय-सामाजिक वारश्याचं जतन करण्याकरिता काँग्रेसचा उमेदवार जीवाचं रान केलं.

अपुऱ्या संसाधनामुळे या उमेदवाराचा प्रचार थांबला नाही, कमी पडला नाही. लोकांमध्ये जात, लोकांमध्ये मिसळत, त्यांच्या सोबत कधी पायी चाल, कधी जमीनीवर झोप असं करत हा उमेदवार आज मैदानात आहे. माझे बंधू आणि दर्यापूर चे आमदार, अमरावती लोकसभा क्षेत्राचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार बळवंत भाऊ वानखडे यांच्या रूपाने महाराष्ट्राला पुन्हा एकदा आर. आर. पाटील सापडला. निष्कलंक चारित्र्य, साधी राहणी, कधी कुणाशी फटकून वागणं नाही मात्र कामात कणखर, विकासाची मानवीय दृष्टी आणि संवेदनशील मन.. या बळवंत भाऊंच्या जमेच्या बाजू. तुम्ही कधीही बळवंत भाऊंना जाऊन भेटू शकता, बोलू शकता. बळवंत भाऊ सामान्य शेतकऱ्याच्या घरात जन्माला आले.

समाजकल्याण विभागाच्या वसतीगृहात राहून शिकलेले भाऊ, लहानपणापासून गरीबी पाहिली, त्यामुळे आज अमरावतीकरांची दुःखं त्यांना माहितीयत. त्यांना मतं मागण्यासाठी नौटंकी करावी लागत नाही. आज जनतेने त्यांची निवडणूक हातात घेतली आहे. या निवडणुकीसाठी लोकांनी स्वतःच्या खिशातले पैसे टाकून प्रचार केला. सध्याच्या काळात जिथे निवडणुका महागड्या होतायत तिथे हे एक आशादायक चित्र महाराष्ट्रात दिसतंय. संविधानाच्या रक्षणासाठी आणि अमरावतीतील शांतता-सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून आज अमरावतीकरांना बळवंत भाऊंची गरज आहे. राजकारणात चांगली माणसं आहेत. ती माणसं पैशाने नाहीत, पण माणुसकीने श्रींमत आहेत. मनाची ही श्रीमंती टिकली पाहिजेत. या महाराष्ट्राने आर. आर. पाटील यांच्यासारखा चारित्र्यसंपन्न नेता पाहिला.

राजकारणातील साधेपणाचं दुसरं नाव म्हणजे आर. आर. पाटील असं म्हटलं जायचं. आबा आज आपल्यात नाहीत, मात्र त्यांची छबी मला बळवंतभाऊंमध्ये दिसते. बळवंत भाऊंसारखे कर्मयोगी, संतवृत्तीची लोकं राजकारणात असली पाहिजेत, संसदेत असली पाहिजेत. अमरावतीकरांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे..”


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: