शहराला वेगळा न्याय आणि ग्रामीण भागाला वेगळा असे चित्र सध्या मूर्तिजापूर तालुक्यात पाहायला मिळत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून तालुक्यातील ग्रामीण भागांना जोडणाऱ्या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे. तर अंतर्गत रस्ते तर सोडाच,तर असाच एक रस्ता ग्राम माना ते पोता दरम्यानच्या मार्गाची मोठी दुर्दशा झाली आहे. शहरात कोट्यावधीची विकास कामांची उधळण होत असताना रस्ते आणि मार्ग यांची आयुष्य तीन महिने, सहा महिने एवढेच. त्यानंतर बनविलेले रस्ते मात्र दम टाकतात आणि त्यांचे रूपांतर खड्डामय होऊन जाते. माना ते पोता मार्गावर पावसामुळे चिखल आणि दलदल निर्माण झालेली असून यामुळे दररोज अपघात घडत आहे. लहान सहान अपघातांकडे कोणी लक्ष देत नाही.परंतु लहान सहान अपघातातूनच एखादी मोठी दुर्घटना होऊ शकते.
मागील काही वर्षापासून या मार्गाची अवस्था दयनीय होत चालली असून खड्डामय रस्त्यावर मुरूम किंवा माती टाकून वेळ निभावून नेण्यात येते. परंतु पावसाळ्यात मुरूम वाहून जातो आणि मातीमुळे चिखल निर्माण होतो. या चिखलामुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये जाणे देखील कठीण होऊन बसले आहे. या मार्गावरून आपल्या इच्छित स्थळी जाणे म्हणजे जीवावर बेतन्यासारखे आहे
ग्राम माना पासून पोता गावापर्यंतचे अंतर ५ किलोमीटर आहे. ग्राम पोता गाव ही अत्यंत जुनी वस्ती असून या ठिकाणी ५० ते ६० घरे आहेत. येथील रहिवाशांना आपल्या सर्व कामांकरिता दररोज ग्राम माना येथे यावे लागते. माना येथे बाजार,बँक,दवाखाना,शाळा याकरिता दररोज येणे जाणे भाग आहे.सदर मार्गाची अवस्था भयभीत करणारी असून विद्यार्थी, आजारी रुग्ण,वयोवृद्ध ,जेष्ठ नागरिक यांच्या करिता अत्यंत त्रासदायक असून या गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची उदासीनता यामुळे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावकरी करीत आहेत.
पावसामुळे गावकऱ्यांची अवस्था दयनीय होत आहे.या रस्त्याने गाडीने तर सोडा पण पायी चालणे देखील मुश्किल होत आहे.माना येथील बऱ्याच शेतकऱ्यांची या रस्त्यावर शेती आहे. त्यांना आपल्या शेतातील कामे करण्याकरिता ट्रॅक्टर किंवा बैलगाडीने जाणे देखील दुरापास्त झाले असून बऱ्याच वेळा लहान मोठे अपघात होत आहेत. गेल्या काही वर्षापासून शेती करणारे माना येथील शेतकरी नाजीमोद्दीन तजिमोद्दीन यांची सोयाबीन भरलेली ट्रॉली या मार्गावर पलटी झाली होती सुदैवाने यामध्ये कोणाचीही जीव गेला नाही परंतु दोघे गंभीररित्या जखमी झाले होते.
त्याचप्रमाणे मो.तनवीर मो.जाकिर यांची पाणीच्या टाक्या भरलेली बैलगाडी पलटी झाली होती ज्यामध्ये बैलगाडीचे मोठे नुकसान झाले होते. ग्राम माना येथील शेतकरी मो.जाकिर मो.कासम,नाजीमोद्दीन तजिमोद्दीन,गणेशराव, लुकमानोद्दीन,असदखान इबादत खान,सै.जावेद सै.इदरीस,सै.मजीत सै.रफी,मो.मुश्ताक मो.खलील,फिरोजखान यूसुफखान व राजेश मोरे या शेतकऱ्यांची या मार्गावर शेती आहे. त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनापासून लोकप्रतिनिधी पर्यंत तक्रारी करून देखील अद्यापही कोणीही दखल घेतलेली नाही.