न्यूज डेस्क – राज्यात परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर राजकीय वर्तुळात चांगली खळबळ उडाली असून विरोधी पक्ष याचा जोरदार फायदा घेत आहे. तर राज्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १५ फेब्रुवारीला घेतलेल्या पत्रकार परिषदेवरून चांगला गोंधळ सुरु आहे.
सकाळी शरद पवारांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत “परमबीर सिंग यांनी उल्लेख केलेल्या दिवसांमध्ये अनिल देशमुख करोनामुळे रुग्णालयात होते”, असं म्हणत पाठराखण केल्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांनी १५ फेब्रुवारीला घेतलेल्या पत्रकार परिषदेचे ट्विट रीट्विट करत शरद पवारांनाच उलट सवाल विचारण्यात येत आहेत. त्यावर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खुलासा करत ट्विट केले आहे.
१५ फेब्रुवारीला अनिल देशमुख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचे व्हिडीओ विरोधकांकडून ट्वीट केले जात असताना अनिल देशमुखांनी ती पत्रकार परिषद रुग्णालयाबाहेरच घेतली असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. “मला कोविड झाल्यामुळे मी ५ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये भरती होतो. १५ फेब्रुवारीला माझा डिस्चार्ज झाला.
त्यावेळी मी हॉस्पिटलमधून बाहेर पडत असताना गेटवर काही पत्रकार होते. त्यावेळी माझ्या अंगात त्राण नव्हता. तेव्हा मी हॉस्पिटलमध्येच खुर्चीवर बसलो आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. त्यानंतर मी घरी जाऊन होम क्वारंटाईन झालो. १५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारीपर्यंत मी होम क्वारंटाईन होतो. २८ फेब्रुवारीला मी पहिल्यांदा बाहेर पडत सह्याद्री गेस्टहाऊसला मीटिंगला गेलो”, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.