न्यूज डेस्क – परतीच्या मार्गावर असलेला मान्सून आता पुन्हा बरसणार आहे. असा इशारा IMD ने दिला आहे,या आठवडाभर राज्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेचे डीवाय डायरेक्टर जनरल ऑफ मेटेरॉलॉजी के.एस.होसालीकर यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.
येणारा आठवडा 11 ते 17 ऑक्टोबर या काळात महाराष्ट्रात कोकणसह आतल्या भागात पाऊस पूर्णपणे सक्रीय राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता आहे. गडगडाटासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. कापणीला आलेल्या पिकांवर त्याचा दाट प्रभाव होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने थोडी उसंत घेतली होती. मात्र वातावरण बदलल्याने पुन्हा पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा सर्वात जास्त फटका हा शेतकऱ्यांना बसणार आहे. सोयाबीनसह अनेक पिकं ही काढणीला आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगांना झाडावरच कोंबं फुटली आहेत. त्यामुळे सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातातून गेल्यात जमा आहे. भाजीपाला आणि इतर फळपिकांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे.