गेल्या आठवड्यापासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले आहे, यामुळे अनेक जिल्ह्यात पावसाने शेती पिकांची नासाडी केली असून शेकार्यांची खरीपाची पिके पाण्याने खरडून गेली आहे. तर धोका अजून संपलेला नसून आता हवामान विभागाकडून राज्यात पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. IMD चे होसाळीकर यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.
राज्यात गेल्या आठवड्यापासून पावसाने मराठवाड्यासह विदर्भात जोरदार हजेरी लावली आहे. विदर्भातील अकोला आणि अमरावतीसह काही जिल्ह्यातही कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मात्र गेल्या तीन-चार दिवसांत पावसानं उसंत घेतली आहे. यानंतर आता हवामान विभागाकडून राज्यात पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
IMD ने आज पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या १८ जिल्ह्यांना पिवळा इशारा (येलो अलर्ट) जारी केला आहे. येत्या काही तासांत याठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी याबाबतचं ट्वीट केलं आहे.